Post views: counter

स्वदेशीची चळवळ

२० जुलै १९०५ रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ठिणगी पडली. सरकारचा दावा असा होता की प्रशासकीय विचारांतून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे हे जनतेने ओळखले होते. बंगालमधील उसळत्या राष्ट्रवादाची लाट त्यायोगे थोपविता येईल, असा साम्राज्यवाद्यांचा मानस होता.
१६ ऑक्टोबर रोजी कलकत्यात सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले. कलकत्यांच्या अनेक रस्त्यांवरुन मिरवणुका निघाल्या व संध्याकाळी प्रचंड सभा झाली. तिला ५०,००० लोक हजर
होते. बंगालच्या खेडयापाडयांतून न शहराशहरांतून सभा, मिरवणुका व निदर्शने यांचे पडसाद सतत उमटत होते.


Loard Curzon
लवकरच राष्ट्रीय चळवळीत एका नव्या आंदोलनाची भर पडली. परकीय बनावटीच्या सर्व वस्तुवर बहिष्कार व त्याऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर हे या चळवळीचे सूत्र होते. अनेक ठिकाणी परदेशी कापडाच्या होळया पेटवण्यात आल्या आणि परदेशी कापड विकणार्‍या दुकानांपुढे निदर्शने करण्यात आली. नव्या नेतृत्वाने प्रशासनाविरुध्द नि:शस्त्र प्रतिकाराचाही आदेश दिला. शाळा, कॉलेजांवर बहिष्कार, न्यायालये व सरकारी नोकर्‍यांचा त्याग असे या असहकार आंदोलनाचे स्वरुप होते, मात्र कार्यक्रमांतील हा भाग परिणामकारकरीत्या अमलात येऊ शकला नाही, परकीय जोखडातून स्वातंत्र्य, अशीही नव्या नेतृत्वाने हाक दिली, त्याचाच एक परिणाम म्हणजे डिसेंबर १९०६ मधील काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना दादाभाई नौरोजींनी स्पष्ट केले की 'स्वराज्य' हेच काॅंग्रेसचे उद्दिष्ट आहेत.
खेडयातील आणि शहरातील सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा देण्यात नवे नेतृत्व विलक्षण यशस्वी झाले. विशेषत: विद्यार्थी, महिला आणि शहरी भागातील कार्यकर्ते, मोठया उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले, स्वदेशी आणि स्वराज्य या घोषणा लवकरच इतर प्रांतांतही प्रसृत झाल्या. परदेशी कापडावरील बहिष्काराचे आंदोलन तर अखिल भारतीय पातळीवर संघटित करण्यात आले. समान सहानुभूती व समान राजकारण या बंधनांनी सारा देश आता एक होऊ लागला.
सरकारने दडपशाहीनेच या आंदोलनास उत्तर दिले. सभांवर बंदी घालण्यात आली. वृत्तपत्रांचा आवाज दडपून टाकण्यात आला. राजकीय कार्यकत्र्यांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेक नेत्यांना परदेशी हद्दपार करण्यात आले आणि विद्याथ्र्यांना मारझोड करण्यात आली. सरकारने जहालांपासून मवाळांना व हिंदूपासून मुसलमानांना वेगळे काढण्याचे प्रयत्न केले. जनता आता जागृत झाली होती, पण तिला योग्य अशा संघटनेत बांधण्यात व लढयाला योग्य दिशा देण्यात नवे नेतृत्व अयशस्वी ठरले. उदाहरणार्थ नि:शस्त्र प्रतिकाराची चळवळ प्रत्यक्षात आली नाही. अखेर लोकमान्य टिळकांना जेव्हा सहा वर्षे काळया पाण्याची शिक्षा झाली. बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांनी राजकारण संन्यास घेतला व लाला लजपत राय परदेशी गेले तेव्हा सरकारला ही चळवळ दडपून टाकणे शक्य झाले.
मोठया जन आंदोलनात परिणामकारक सहभागाची संधी न मिळाल्याने व सरकारी दडपशाहीचा प्रतिकार करण्यास कोणताच बाब न राहिल्याने युवा वर्ग दहशतवादी क्रांतिकारी मार्गाकडे वळला आणि तिरस्करणीय अधिकार्‍यांची हत्या करणे हीच त्यांच्या राजकीय कार्याची पध्दत बनली. अनुशीलन व युगांतर हे त्या काळातील दोन प्रमुख दहशतवादी गट होते. या क्रांतिकारी दहशतवाद्यांना जनतेच्या पाठिंब्याचा आधार नव्हता व म्हणूनच ती चळवळ फार काळ टिकू शकली नाही. पण राष्ट्रीय चळवळीतील त्यांचेही योगदान मोलाचे आहे.
इसवीसन १९०९ पासून १९१६ पर्यंत राष्ट्रवादी चळवळ सुप्त स्थितीत होती, पण पहिल्या महायुध्दाच्या काळात भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणार्‍या इंग्रज विदुषी अ‍ॅनी बेझंट यांनी आणि करावासातून मुक्त झालेल्या लोकमान्य टिळकांनी 'इंडियन होमरुल लीग' च्या संरक्षणासाठी सनदशीर मार्गाने अखिल भारतीय आंदोलन पुन्हा सुरु केले. युध्दकाळात परदेशातील क्रांतिकारी कार्यकर्तेही क्रियाशील होते. त्यात अमेरिकेत व कॅनडात स्थापन झालेल्या व पूर्व आणि आग्नेय आशियात शाखा असलेल्या गदर पक्षाचा विशेष उलेख केला पाहिजे. त्यानेच भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा