Post views: counter

इतिहास घटकविषयाचा तार्किक अभ्यास

                                   इतिहास हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो. कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा अधिक स्वारस्यपूर्ण असं बरंच काही या विषयात आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

                                   प्रशासनात काम करताना अधिकारी हे कल्याणकारी राज्याचे प्रतिनिधित्व करत असतात. नफ्या-तोटय़ाच्या तराजूपेक्षा जनतेच्या 'कल्याणा'चे मापदंड इथे जास्त महत्त्वाचे ठरतात. हे कल्याणकारी कामाचे मापदंड समाजाची रचना, वैशिष्टय़े आणि इतिहास यांच्या आधारे ठरवले जातात. त्यामुळेच स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये 'इतिहास' हा घटक निरपवादपणे समाविष्ट असतो. 'इतिहासा'च्या समावेशाचे हे कारण लक्षात घेतले तर कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा  स्वारस्यपूर्ण अशा अनेक गोष्टी या विषयात आहे, हे लक्षात येईल. 'इतिहास' हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो, हे लक्षात घ्यायला हवे.
                                  मुख्य परीक्षेमध्ये आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. हा पूर्ण भाग पूर्वपरीक्षेतही असल्याने एकत्रितपणे अभ्यास वेळेच्या बचतीसाठी आवश्यक आहे. प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची रणनीती आपण पूर्वपरीक्षेच्या विभागात सविस्तरपणे पाहिली आहे. आधुनिक इतिहासाच्या तयारीसाठीची पद्धत या प्रकारामध्ये पाहू या.

अभ्यासक्रमातील पहिला विभागच भारत व महाराष्ट्राला 'आधुनिक' करणाऱ्या बाबींची चर्चा करतो. रेल्वे, टपाल, उद्योगधंदे इत्यादी बाबींचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे  करणे आवश्यक आहे-

  • विकासाचे टप्पे, प्रत्येक टप्प्याची पाश्र्वभूमी
  • संबंधित राज्यकत्रे
  • भारतीय उद्योगपती व भारतीय उद्योगांची सुरुवात
  • आधुनिक शिक्षणाचा अभ्यास करताना या बाबतीत नेमलेल्या समित्या व त्यांच्या शिफारसी यांचा तक्ता महत्त्वाचा ठरेल. शिक्षणासाठी विविध समाजसुधारकांचे शिक्षणविषयक कार्य त्यांच्या एकत्रित अभ्यासात समाविष्ट करायचे आहे.
  • वृत्तपत्रे, भाषा, त्यांचे संस्थापक, असल्यास ब्रीदवाक्य, सर्वात पहिले व सर्वात जुने वृत्तपत्र, नियतकालिके अशा पद्धतीने मुद्रितमाध्यमांचा अभ्यास करता येईल. यामध्ये काही संघटनांची मुखपत्रेसुद्धा महत्त्वाची आहेत.
  • सामाजिक-सांस्कृतिक बदल व भारत आणि महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य या बाबी एकत्रितपणे अभ्यासायच्या आहेत. तक्ता कसा करता येईल ते पाहू.
समाजसुधारक, संस्था, वृत्तपत्र, साहित्य, महत्त्वाच्या घटना (कालानुक्रमे), कार्य, प्रसिद्ध वाक्ये, असल्यास लोकापवाद, इतर माहिती.
 यामधील संस्थांच्या स्तंभात संस्थेची स्थापना, कार्यपद्धती, महत्त्वाचे योगदान, ब्रीद, असल्यास मुखपत्र व संबंधित महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असावा. विशेषत: अभ्यासक्रमात नमूद केलेल्या संस्था, समाजसुधारक, स्वातंत्र्य लढय़ावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या दलित व मुस्लीम सुधारणा चळवळींचा अभ्यास पाश्र्वभूमी, कारणे, स्वरूप, परिणाम, प्रतिक्रिया व व्यक्तिमत्त्व या मुद्दय़ांच्या आधारे करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे सामाजिक सुधारणांबाबतचे मूल्यमापन नोंदवल्यास अभ्यास परिपूर्ण होणार आहे.
  • ब्रिटिशांची आíथक नीती, जमीन सुधारणा, जंगल कायदे इत्यादींचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम व संबंधित भारतीय नेत्यांची विधाने या गोष्टी राष्ट्रवादाचा उदय व संघर्ष अभ्यासण्याआधी समजून घ्यायला हव्यात.
  • शेतकरी व आदिवासींचे बंड, १८५७ चा उठाव अशा संघर्षांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करता येईल.
  • कारणे/ पाश्र्वभूमी (शेतकरी/आदिवासींसाठी प्रदेशनिहाय कारण अनेक बाबतीत थोडय़ाफार प्रमाणात वेगळे आहे.)
  • स्वरूप/ विस्तार/ वैशिष्टय़े
  • प्रमुख नेते व त्यांच्या बाबतीत ठळक घडामोडी
  • यशापयशाची कारणे
  • परिणाम
  • उपलब्ध असल्यास इतिहासकारांच्या/ समकालीनांच्या प्रतिक्रिया.
  • गांधीयुगातील शेतकरी, आदिवासी, कामगार, संस्थानी जनता इत्यादींच्या चळवळी/ बंड यांचाही अभ्यास या मुद्दय़ांच्या आधाराने करता येईल.
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या दोन (मवाळ व जहाल) कालखंडांतील स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करता येईल-
  • स्थापनेची सामाजिक, राजकीय, आíथक पाश्र्वभूमी व त्याबाबतचे सिद्धांत.
  • दोन्ही कालखंडांतील नेत्यांच्या मागण्या दोन कॉलममध्ये तौलनिक पद्धतीने.
  • दोन्ही कालखंडांतील महत्त्वाचे नेते व त्यांचे वैशिष्टय़पूर्ण कार्य.
  • दोन्ही कालखंडांतील यशापयश, ब्रिटिशांची प्रतिक्रिया.
  • सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार, सांप्रदायिकतेचा उदय.
                           गांधीयुगातील विविध चळवळी (असहकार, सविनय कायदेभंग, चले जाव इत्यादी) अभ्यासताना त्यातील संघर्षांचे स्वरूप व त्यामागील विचारसरणी समजून घेऊन मग महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करणे श्रेयस्कर ठरेल. या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, समकालीन भारतीय नेत्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया व यशापयश या गोष्टी अभ्यासणे आवश्यक आहे. याच काळात वाढलेली सांप्रदायिकता, त्याची कारणे, स्वरूप, परिणाम आणि व इतर राजकीय पक्षांची वाटचाल अभ्यासणे अत्यंत आवश्यक आहे. काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने, ठराव, वर्ष, ठिकाण व अध्यक्ष अशा मुद्दय़ांच्या आधारे तक्त्यामध्ये अभ्यासता येतील.
                         भारताच्या घटनात्मक विकासाचा अभ्यासक्रमात वेगळा उल्लेख नसला तरी ब्रिटिशांच्या  कायद्यांचा व स्वातंत्र्याच्या योजनांचा कालानुक्रमे अभ्यास महत्त्वाचा आहे. या कायद्यांची पाश्र्वभूमी, तरतुदी, परिणाम, भारतीयांच्या प्रतिक्रिया, संबंधित व्हाइसरॉय, भारतमंत्री इत्यादी मुद्दय़ांचा एकत्रित अभ्यास करता येईल.
  • स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात फाळणीचे स्वरूप, परिणाम व उपाय आणि संस्थानांचे विलीनीकरण- विशेषत: जुनागढ, हैदराबाद व काश्मीरच्या बाबतीत परिपूर्ण अभ्यासायला हवे.
  • भारताचे परराष्ट्र धोरण, आण्विक धोरण या बाबी नेहरू व इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. विचारात घ्यायचे मुद्दे पुढीलप्रमाणे-
  • धोरणाची आंतरराष्ट्रीय पाश्र्वभूमी
  • धोरणाची राष्ट्रीय गरज, कारणे
  • धोरणाचे नेमके स्वरूप, तत्त्वे, कालपरत्वे त्यामध्ये झालेले बदल व त्यांची कारणे
  • धोरणाची अंमलबजावणी करताना घडलेल्या ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी
  • धोरणाचे परिणाम व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
  • मूल्यमापन
  • नेहरू व इंदिरा गांधी यांचे महत्त्वाचे निर्णय, कारणे, परिणाम इ. बाबी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी अभ्यासताना महत्त्वाच्या ठरणार आहेत.
  • भाषावार प्रांतरचनेची मागणी, त्यासाठीचे आयोग व शिफारसी विशेषत: संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करायच्या प्रदेशाबाबतीतील शिफारसी हा भाग काळजीपूर्वक अभ्यासायला हवा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास महत्त्वाचे नेते, विविध विचारप्रवाह, राजकीय पक्ष व त्यांच्या भूमिका, महत्त्वाच्या घडामोडी अशा मुद्दय़ांच्या आधारे करता येईल.
  • पहिल्या सहा पंचवार्षकि योजनांचा अभ्यास या पेपरमध्येही आवश्यक ठरतो. या आधारे नक्षलवाद, माओवाद, विकासाचा असमतोल इत्यादी बाबींचा संकल्पनात्मक अभ्यास शक्य होईल.
  • महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशामध्ये दृश्यकलांचा अभ्यास प्राचीन ते आधुनिक अशा क्रमाने करणे सोपे होईल. प्राचीन कला आढळणारी स्थाने, त्यांचा काळ व स्वरूप (आकृत्या, रंग, तंत्रज्ञान इ.) आश्रयदाते राज्यकत्रे अशा मुद्दय़ांच्या आधारे तक्ता तयार करता येईल. मध्ययुगीन दृश्यकलांचाही अशाच प्रकारे अभ्यास करता येईल; मात्र येथे समकालीन इतर स्थापत्य व चित्रकलांचा आढावा घेणे अधिक चांगले.
  • वाङ्मय प्रकारातील ज्यांचा उल्लेख अभ्यासक्रमात केला आहे त्यांची वैशिष्टय़े, महत्त्वाचे साहित्यकार, त्यांच्या प्रसिद्ध रचना, त्यांचे महत्त्व अशा प्रकारे अभ्यास आवश्यक आहे.
  • प्रायोगिक कलांपकी लोककलांचे स्वरूप, त्यांचे सांस्कृतिक-धार्मिक पलू, त्यांचे विशिष्ट प्रदेश, महत्त्वाचे कलाकार, त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न असे मुद्दे अभ्यासावेत. इतर प्रायोगिक कलांमधील विकासाचे प्रमुख टप्पे, प्रसिद्ध/पुरस्कारप्राप्त कलाकार इ. बाबी महत्त्वाच्या आहेत.
  • हा घटकविषय अभ्यासण्यासाठी Modern India : Spectrum Mains Guide, आधुनिक भारताचा इतिहास एक नवीन मूल्यांकन : ग्रोव्हर आणि बेल्हेकर, महाराष्ट्रातील समाजसुधारक : के. सागर, महाराष्ट्राचा सर्वागीण इतिहास : के. सागर. राज्य पाठय़पुस्तक मंडळ अकरावीचे इतिहासाचे पुस्तक आदी संदर्भसाहित्य उपयुक्त ठरतील.

३ टिप्पण्या: