सुकन्या योजना
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. देशात मुलींची पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केली. महाराष्ट्राचा हा प्रागतिक विचार जोपासून राज्यात मुलींचे शिक्षण आणि आरोग्यात सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे तसेच मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण करुन बालविवाह रोखणे, मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात सुकन्या योजना शासनाने 13 फेब्रुवारी 2014 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये 1 जानेवारी 2014 पासून लागू केली आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखाली जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे शासन 21 हजार 200 रुपये आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवणूक करणार आहे.
- त्यानंतर या मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपये तिला मिळणार आहेत.
- आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून नाममात्र 100 रुपये प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करुन या मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरविला जाईल.
- ज्यात पालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना रक्कम अदा करण्यात येईल.