Post views: counter

Current Affairs February 2017 Part- 5

🔰 Current Affairs Marathi 🔰:
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इस्रायलशी १७ हजार कोटींचा क्षेपणास्त्र करार

भारत सरकारने इस्रायलबरोबर झालेल्या १७ हजार कोटींच्या क्षेपणास्र कराराला शुक्रवारी हरिवा कंदील दिला. त्यामुळे दोन्ही देश आता एकत्रतिपणे जमनिीवरून आकाशात ७० कमिीपर्यंत हल्ला करून शकणारे बराक क्षेपणास्त्र तयार करतील. हा प्रकल्प संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि इस्राइलची एअरक्राफ्ट इंडस्ट्री हाताळणार आहे.

यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्राइलला भेट देणार आहेत. त्यापूर्वी या कराराला सरकारचा हरिवा कंदील मिळणे महत्त्वपूर्ण मानले जाते आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षेबाबत झालेल्या कॅबनिेट समतिीच्या बैठकीमध्ये या निर्णय घेण्यात आला. भारत आणि इस्रायलदरम्यान लष्कराच्या उत्पादनांचा व्यापार मोठ्या प्रमाणार होतो.

 नोव्हेंबरमध्ये इस्रायलच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान संरक्षण क्षेत्रातील भागदिारी पुढे नेण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. हे क्षेपणास्त्र विमान, हेलिकॉप्टर आणि ड्रॉनच्या मदतीने होणारे हल्ले परतवून लावण्यात यशस्वी ठरेल. हे क्षेपणास्त्र भारत सध्या वापरत असलेल्या बराक रचनेवरच आधारीत असेल, मात्र त्यात गरजेनुसार काही बदले केले जाण्याची शक्यता आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऑस्ट्रेलियानं भारताचा विजयरथ रोखला!

गेल्या चार वर्षांत मायदेशातील एकही कसोटी सामना न गमावलेल्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुणे कसोटीत तिसऱ्याच दिवशी दारुण पराभव पत्करावा लागला आहे. कांगारुंनी विजयासाठी दिलेलं ४४१ धावांचं महाकठीण आव्हान पेलताना कोहली कंपनी साफ गळपटली. फिरकीपटू स्टीव्ह ओकीफ आणि नॅथन लायनपुढे रथी-महारथींनी सपशेल नांगी टाकल्यानं भारताचा दुसरा डाव १०७ धावांतच आटोपला आणि ऑस्ट्रेलियानं ३३३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.



गेल्या १२ वर्षांत कांगारुंना भारतीय मैदानावर एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता. विराटसेनेचा अलीकडचा फॉर्म पाहता, यावेळीही भारताचंच पारडं जड होतं. पण, कर्णधार स्टीव्ह स्मिथचं शतक आणि स्टीव्ह ओकीफनं घेतलेल्या एक डझन विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं भारतात 'जिंकून दाखवलं' आणि चार कसोटींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. नॅथन लायनच्या फिरकीनंही भारतीय वीरांची गिरकी घेतली. त्यामुळे १९ कसोटी सामन्यांनंतर टीम इंडियाला पराभवाची चव चाखावी लागली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतातील “एफडीआय’ 46 अब्ज डॉलरवर

भारतातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) 2016 मध्ये 18 टक्क्यांनी वाढून 46 अब्ज डॉलरवर पोचली आहे, अशी माहिती औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने दिली आहे.

विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 2015 मध्ये 39.32 अब्ज डॉलर "एफडीआय' आली होती. सेवा, दूरसंचार, व्यापार, हार्डवेअर व सॉफ्टवेअर आणि वाहननिर्मिती या क्षेत्रात परकी गुंतवणूकदारांचा गुंतवणूक करण्यावर जोर आहे. सिंगापूर, मॉरिशस, नेदरलॅंड आणि जपानमधून मोठ्या प्रमाणात "एफडीआय' आली आहे. केंद्र सरकारने परकी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यात एफडीआय धोरणात शिथिलता आणि व्यवसाय करण्याच्या वातावरणातील सुधारणा या बाबींचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात परकी गुंतवणुकीचे नियम आणखी शिथिल केले आहेत. तसेच, परकी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशाला परकी गुंतवणुकीची गरज
भारतासाठी परकी गुंतवणूक अतिशय गरजेची आहे. देशातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठडी 1 ट्रिलियन डॉलरचा निधी आवश्यक आहे. यात बंदरे, विमानतळे, महामार्ग यांचा समावेश आहे. देशातील परकी गुंतवणुकीचा ओघ वाढल्यानंतर आर्थिक स्थिती सुधारण्यासोबत जागतिक चलनांच्या तुलनेत रुपयाची स्थितीही भक्कम होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹Annular Solar Eclipse 2017: २६ फेब्रुवारी रोजी होणार कंकणाकृती सूर्यग्रहण, खगोलप्रेमींसाठी पर्वणी

या महिन्याच्या शेवटी होणारे सूर्यग्रहण जगभरातील खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. सर्व जगभरात या सूर्यग्रहणाविषयी चर्चा होत आहे. या महिन्यात होणारे सूर्यग्रहण हे या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ठरणार आहे. सुर्यासमोरुन चंद्र जाणार आहे, तेव्हा हे सूर्यग्रहण होईल. या सूर्यग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. म्हणजेच सूर्य एखाद्या बांगडीसारखा दिसणार आहे. हे सूर्यग्रहणा पाहण्यासाठी जगभरातील सर्व खगोलप्रेमी उत्सुक आहेत. जाणून घेऊया या सूर्यग्रहणाविषयी.

कधी होणार सूर्यग्रहण?

२६ फेब्रुवारी रोजी हे सूर्यग्रहण होणार आहे. चंद्र सूर्यासमोर येईल आणि सूर्याच्या फक्त चमकदार कडा आपल्याला दिसतील. त्यामुळेच या सूर्यग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

कुठे होणार सुरुवात?

सूर्यग्रहण हा एक नैसर्गिक योगच असतो. या सूर्यग्रहणाची सुरुवात चिलेमधून होणार आहे आणि दक्षिण अमेरिकेमध्ये सकाळी सकाळपासून दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागराच्या भागात हे सूर्यग्रहण दिसेल. नैऋत्य अफ्रिकेमध्ये हे सूर्यग्रहण संपेल.

कसे होते कंकणाकृती सूर्यग्रहण?

सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आल्यावर ग्रहण होते. पृथ्वीभोवती फिरताना २६ फेब्रुवारीला चंद्र सूर्या समोरुन जाईल. सूर्यग्रहण हे पूर्णपणे नैसर्गिक असते परंतु काही ठिकाणी सूर्यग्रहणाला अशुभ मानले जाते. हे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला देण्यात आला आहे.

आपण भारतात हे सूर्यग्रहण पाहू शकतो का?

हे सूर्यग्रहण भारतीय खगोलशास्त्र प्रेमींना पाहता येणार नाही. हे सूर्य ग्रहण केवळ लॅटिन अमेरिका, नैऋत्य अफ्रिका, प्रशांत महासागर, अटलांटिक आणि अंटार्टिका या भागात दिसणार आहे. त्यामुळे भारतीय खगोलशास्त्र प्रेमी या सूर्याग्रहणाला मुकणार आहेत.

कधी आहे पुढील सूर्यग्रहण?

पुढील सूर्यग्रहण २१ ऑगस्ट रोजी आहेत. हे सूर्यग्रहण अमेरिकेमध्ये दिसणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जयललिता यांच्या भाचीचा नवा पक्ष

तामिळनाडूच्या दिवगंत मुख्यमंत्री जयललिता यांच्या भाची दीपा जयकुमार यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. एमजीआर आम्मा दीपा पैरवे असे या नव्या पक्षाचे नाव असणार आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर मोकळय़ा झालेल्या आर. के. नगर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, ही जनतेची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आण्णा द्रमुकच्या नेत्या असलेल्या जयललिता यांच्या निधनानंतर राज्यात राजकीय संघर्ष उफाळला आहे.

 जयललिता यांच्या दीर्घकाळ सहकारी शशिकला यांनी पक्षावर ताबा मिळवला आहे. त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी बंड पुकारले असून दीपा यांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बांग्लादेशचे शहर ‘सिलहट’ च्या
विकासासाठी भारत आर्थिक मदत देणार

उत्तर-पूर्व बांग्लादेश प्रदेशामधील शहर ‘सिलहट’ याच्या शाश्वत विकासासाठी भारताकडून बांग्लादेशला आर्थिक मदत केली जाणार आहे. याविषयी झालेल्या सामंजस्य (MoU) कराराअंतर्गत सिलहट मध्ये तीन विकास प्रकल्पे राबवली जाणार आहे.

या करारावर भारतीय उच्चायुक्त हर्षवर्धन श्रिंगला आणि आर्थिक संबंध विभागाचे अतिरिक्त सचिव शाह मो. अमिनुल हक, सिलहट महानगरपालिका CEO इनामुल हबीब यांनी सिलहट मध्ये स्वाक्षर्या केल्यात.

प्रकल्पांमध्ये पाच मजली किंडर गार्डन आणि हाय स्कूल इमारत, सहा मजलि क्लिनर कॉलनी इमारत यांच्या बांधकामाकरिता आणि इतर विकास कार्यांकरिता एकूण 240 दशलक्ष टाका (चलन) ची आर्थिक मदत केली जाईल.

याशिवाय, याआधी भारताने राजशाही आणि खुल्ना या शहरांच्या विकासासाठी देखील अनुक्रमे 210 दशलक्ष टाका आणि 120 दशलक्ष टाका रक्कम मंजूर केलेली आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लाइकर आणि लेह दोस्मोचेय महोत्सवाला सुरुवात

जम्मू आणि काश्मीर मधील लदाख प्रदेशामध्ये, शतकापासून दरवर्षी आयोजित होणार्या “लाइकर आणि लेह दोस्मोचेय” महोत्सवाचा 24 फेब्रुवारी 2017 रोजी शुभारंभ झाला.

दोन दिवसीय या कार्यक्रमामध्ये विविध मठातील धार्मिक वाद्यांच्या संगीतावर मुखवटे घालून नृत्य (Mask dance) प्रकार सादर केल्या जाते. दोस्मोचेय” हा लदाख प्रदेशात आयोजित होणारा हिवाळ्यातील एक प्रमुख महोत्सव आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डिजीटल पेमेंट क्षेत्रात उतरणार ‘व्हॉटसअॅप’?

लवकरच डिजीटल पेमेंट क्षेत्रात लोकप्रिय मेसेंजर अॅप ‘व्हॉटसअॅप’ उतरण्याची शक्यता व्हॉटसअॅपचे सहसंस्थापक ब्रायन ऍक्टॉन यांनी व्यक्त केली आहे.

नुकतेच ऍक्टॉन हे भारत भेटीवर आले होते. त्यावेळी त्यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. ते व्हॉटसअॅपवर स्टेटस देण्याच्या नव्या पद्धतीबाबत बोलताना म्हणाले, मी आणि जान यांनी यापूर्वीच स्टेटसमध्ये आपण बदल करावेत याबाबत चर्चा केली होती. मात्र आमचे प्राधान्यक्रम वेगळे होते. त्यामुळे यावर काम करायला आम्हाला वेळ लागला. आम्ही सादर केलेल्या स्टेटसच्या नव्या पद्धतीला सकारात्मक प्रतिक्रिया मिळालेल्या नाहीत. मात्र याबाबत एवढ्यात कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही.

फेसबुकने विकत घेतलेल्या व्हॉटसअॅपमध्ये सध्या गुंतवणूक वाढली आणि त्यात आवश्यक ते बदल वेगाने करता आले, असेही ऍक्टॉन यांनी सांगितले. ऍक्टॉन यांनी युक्रेनमध्ये जन्मलेल्या जान कोम यांच्यासोबत २००९ साली व्हॉटसअॅपची स्थापना केली. मागील महिन्यातच व्हॉटसअॅपने आपला आठवा जन्मदिन साजरा केला आहे. व्हॉटसअॅपचे जगभरात एकूण १ अब्ज २० कोटी युजर्स आहेत. तर एकट्या भारतामध्ये २० कोटी युजर्स आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एबी डिव्हिलिअर्सने सचिन, सौरभ आणि धोनीला टाकलं मागे

दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. शनिवारी न्यूझीलंडविरोधात खेळण्यासाठी जेव्हा डिव्हिलिअर्स मैदानात उतरला तेव्हा काही वेळातच त्याने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. फलंदाजी करताना डिव्हिलिअर्सने पाच धावा पुर्ण करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9000 धावाही पुर्ण केल्या. यासोबतच डिव्हिलिअर्सच्या नावे एक नवा विक्रम नोंद झाला असून भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनीला त्याने मागे टाकलं आहे.

डिव्हिलिअर्स एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 9000 धावा पुर्ण करणार फलंदाज ठरला आहे. 9000 धावांचा टप्पा पुर्ण करण्यासाठी डिव्हिलिअर्सला फक्त 205 डाव खेळावे लागले. हा नवा विक्रम आपल्या नावे करताना डिव्हिलिअर्सने सौरभ गांगुली (228), सचिन तेंडुलकर (235), ब्रायन लारा (239), रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस (242) आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी (244) यांना मागे टाकलं आहे.

सर्वात कमी एकदिवसीय सामने खेळताना डिव्हिलिअर्सने हा रेकॉर्ड केला. फक्त 214 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 9000 धावा पुर्ण केल्या आहे. यामध्येही डिव्हिलिअर्सने सौरभ गांगुली (236), सचिन तेंडुलकर (242), लारा (246) आणि रिकी पाँटिंग (248) यांना मागे टाकलं आहे.

9000 धावा पुर्ण करणा-या फलंदाजांच्या यादीत डिव्हिलिअर्स सरासरीमध्येही सर्वांच्या पुढे असून त्याची फलंदाजी सरासरी 53.89 आहे. सरासरीच्या यादीत डिव्हिलिअर्सनंतर एम एस धोनीचा नंबर असून धोनीने 51.14 च्या सरासरीने 9000 धावा पुर्ण केल्या होत्या.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पवनऊर्जेच्या दरात मोठी घसरण

१ हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाच्या लिलावात पवन ऊर्जा क्षेत्रातील वीजेचा दर विक्रमी प्रमाणात घसरून प्रति युनिट ३.४६ रुपये झाला आहे. रेवा सोलार पार्कमधील सौर वीजेचा दर २.९७ रुपये प्रति युनिट झाला आहे. या सार्वकालिक कमी दर ठरला आहे. त्यापाठोपाठ आता पवन ऊर्जेच्या दरातही विक्रमी घसरण झाली आहे. देशाच्या ऊर्जा क्षेत्रासाठी हा शुभशकून मानला जात आहे. सूत्रांनी सांगितले की, मित्राह एनर्जी, ग्रीन इन्फ्रा विंड एनर्जी, आयनॉक्स विंड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस, ओस्ट्रो कछ विंड आणि अदानी ग्रीन एनर्जी या पाच कंपन्यांनी १ हजार मेगावॅटच्या ब्लॉकसाठी ३.४६ रुपये प्रति युनिट दराच्या निविदा भरल्या आहेत.

शहर विकास मंत्रालयाने आज ‘वारसा शहर विकास आणि संवर्धन योजना’ (Heritage City Development and Augmentation Yojana - हृदय) अंतर्गत गुजरातमध्ये 6 किलोमीटर लांबीच्या बेट द्वारका दर्शन सर्किटचा विकास करायला मंजुरी दिली असून, यासाठी 16.27 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
दर्शन सर्किट अंतर्गत जी कामे केली जाणार आहेत त्यामध्ये, गल्ल्या आणि पदपथंचा विकास, समुद्र किनाऱ्यांच्या नजीक सायकल मार्ग, वृक्षारोपण, बेंच, विश्राम स्थळ, कपडे बदलण्यासाठी खोल्या, पेयजल, शौचालय सुविधा आदी गोष्टींचा समावेश आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नौदलाचा महिनाभर युद्धसराव

भारतीय नौदलाने ‘थिएटर लेव्हल रेडिनेस अँड ऑपरेशनल एक्झरसाइज’ (ट्रॉपेक्स) या मोठ्या युद्धसरावाचे आयोजन केले होते. तो महिनाभर सुरू होता. लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल यांनी संयुक्तपणे युद्धसरावात भाग घेऊन युद्धाच्या तयारीची चाचपणी केली.

या युद्धसरावात देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा सामरिक आयुधांनी सहभाग घेतला होता. आण्विक पाणबुडी, आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू नौका, सुखोई-३०, जॅग्वार या लढाऊ विमानांचा युद्धसरावात सहभाग होता. अरबी समुद्र आणि उत्तर मध्य हिंदी महासागर अशा विस्तीर्ण टापूमध्ये महिनाभर हा सराव सुरू होता. संभाव्य धोक्यांना सामोरे जाता यावे, याकरिता सुरक्षा दलांच्या युद्धाच्या तयारीची चाचणी या सरावाद्वारे करण्यात आली.

संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे, की ‘सध्याच्या सुरक्षाव्यवस्थेसमोर असलेल्या आव्हानांचा विचार करता ‘ट्रॉपेक्स’चे निश्चितच महत्त्व आहे. भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल यांच्या युद्धाच्या तयारीची चाचणी यांद्वारे होते; तसेच सुरक्षा दलांमधील समन्वय याद्वारे मजबूत होतो. याचा फायदा गुंतागुंतीच्या अशा संघर्षावेळी होतो.

युद्धनौका, लढाऊ विमानांचा समावेश
या युद्धसरावात पश्चिम आणि पूर्व नौदल कमांडच्या ४५हून अधिक नौका, पाच पाणबुड्या सहभागी झाल्या होत्या. आण्विक पाणबुडी ‘चक्र’ हिचाही समावेश युद्धसरावात होता. नौदलाची ५० लढाऊ विमाने, तटरक्षक दलाच्या ११ नौका, लष्कराच्या काही तुकड्या, हवाई दलाची २० लढाऊ विमाने यामध्ये सहभागी झाली होती. सुखोई-३० आणि जॅग्वार ही लढाऊ विमाने सहभागी झाली होती. २३ जानेवारीपासून २३ फेब्रुवारीपर्यंत हा युद्धसराव चालला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सागरी प्रवाशांना विम्याचे कवच

 रेल्वे, विमान सेवेप्रमाणेच जलप्रवासालाही लवकरच "विम्याची कवच कुंडले' मिळणार आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) यासाठी सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांबरोबर चर्चा सुरू केली आहे. लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळणार आहे.

जलवाहतुकीला राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. या पार्श्वभूमीवर जलवाहतूक अधिक सुरक्षित व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार या प्रवाशांना विम्याचे संरक्षण देण्याचे निश्चित केले आहे. मुंबईत येणारे बहुसंख्य परदेशी पर्यटक घारापुरी लेणी आणि अलिबाग येथे बोटीने जातात. त्यामुळेही मंडळाने विम्याची कल्पना पुढे आणली आहे.

"एमएमबी'च्या आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी दोन कोटी प्रवासी हे समुद्रमार्गे प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विम्याची कवच कुंडले असणे महत्त्वाचे आहे. प्रवाशांना किती रकमेचा विमा द्यावा, यावर चर्चा झालेली नाही.
तिकिटात विम्याची रक्कम समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे. विमा प्रीमियमबाबत कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. चर्चा झाल्यावर निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

गृह विभागाकडून दक्षता

बिहारमध्ये जानेवारीत बोट दुर्घटना घडली होती. त्यात 20 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. भविष्यात अशा घटना राज्यात होऊ नयेत, याची खबरदारी गृह विभागाने घेतली आहे. त्याचबरोबर सागरी प्रवास करणाऱ्यांचाही विमा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतात सर्वाधिक नैराश्यग्रस्त लोक; डोक्यावर वाढता ताण

धकाधकीची जीवनशैली आणि दैनंदिन जीवनातील असुरक्षिततेमुळे प्रत्येकाच्या डोक्यावरील ताणतणाव वाढत चालला आहे. नैराश्यग्रस्त लोकांची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. भारताप्रमाणेच जगभर ही समस्या दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेनेही हा धोका मान्य केलेला दिसतो.

2005 ते 2015 हा दहा वर्षांचा कालखंड लक्षात घेतला तर नैराश्यग्रस्त लोकांच्या संख्येत अठरा टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येते. भविष्यामध्ये हे संकट अधिकच बिकट होणार असून, विकसनशील देशांमध्ये ही समस्या गंभीर रूप धारण करत आहे.

नैराश्यामुळे वाढत जाणारे आत्महत्यांचे प्रमाण हे सर्वाधिक चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे तरुणाई नैराश्याच्या आजाराला बळी पडत असल्याचे दिसून आले.

वाढते नैराश्य

7,88,000 लोकांनी 2015 मध्ये आत्महत्या करून जीवन संपविले
322 : जगभरातील नैराश्याने ग्रासलेले लोक
18.4 टक्के : नैराश्यग्रस्त लोकांच्या संख्येत 2005 ते 2015 मधील वाढ

नैराश्याचा आजार झालेल्यांची संख्या

देश - नैराश्य - उद्विग्नता

भुतान : 30947 - 27304
श्रीलंका : 802321 - 669259
उत्तर कोरिया : 874632 - 886706
नेपाळ : 890361 - 999454
म्यानमार : 1917983 - 1727123
थायलंड : 2885221 - 2275400
बांगलादेश : 6391760 - 6900212
इंडोनेशिया : 9162886 - 8114774
भारत : 5,66,75969 - 38425093
चीन : 54815739 - 40954022
(स्रोत : जागतिक आरोग्य संघटना)

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ओएनजीसी आता ‘एचपीसीएल’ ताब्यात घेणार?

ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन अर्थात ओएनजीसी लवकरच हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनवर ताबा मिळवण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर तिसर्या क्रमांकाचा तेल आयातक देश असलेल्या भारताची एक मोठी तेल कंपनी असणे आवश्यक आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर परदेशी मालमत्तांचे अधिग्रहण करणे सोपे होईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना म्हणाले.

जेटलींनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितल्याप्रमाणे, भारतातील सर्व सरकारी तेल कंपन्यांचे एकत्रीकरण होणे शक्य आहे. एकत्रीकरणानंतर ओएनजीसी देशातील सर्वात मोठी तेल कंपनी ठरणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सरकारची एचपीसीएलमध्ये असलेली 51.11 टक्के हिस्सेदारी ओएनजीसी स्थानांतरीत केली जाण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात ओएनजीसीचा शेअर 195.20 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात किरकोळ घसरण झाली आहे. पचे रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 125.40 रुपयांची नीचांकी तर 212 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.250,953.91 कोटींचे बाजारभांडवल आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऑस्कर 2017 विजेत्यांची यादी

•  सर्वोत्कृष्ट चित्रपट - मूनलाईट

•  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - एमा स्टोन (ला ला लँड)

•  सर्वोत्कृष्ट अभिनेता - केसी अ‍ॅफ्लेक (मँचेस्टर बाय द सी)

•  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - डेमियन चॅझेल (ला ला लँड)

•  सर्वोत्कृष्ट सह अभिनेता - महेरशाला अली (मूनलाईन)

•  सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री - व्हायोला डेव्हिस (फेन्सेस)

•  सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - ला ला लँडसर्वोत्कृष्ट अनिमेशनपट - झूटोपिया

•  सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर - ओ. जे. : मेड इन अमेरिका

•  सर्वोत्कृष्ट वेशभूषा - फॅन्टास्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फार्इंड देम

•  सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा - सुसाईड स्क्वाड

•  सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - हॅकसॉ रिज (केविन ओनेल)

•  सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल) - मँचेस्टर बाय द सी (केनेथ लोनरगन)

•  सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) - मूनलाईट (बॅरी जेंकिन्स आणि टॅरेल अ‍ॅल्विन मॅकक्रेने)

•  सर्वोत्कृष्ट गीत - सिटी ऑफ स्टार्स (ला ला लँड)

•  सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - लाईनस सॅडग्रेन (ला ला लँड )

•  सर्वोत्कृष्ट संकलन (एडिटिंग) - हॅकसॉ रिज

•  सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट - द सेल्समन

•  सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - ला ला लँड

•  सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉट - पाईपर

•  सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग - अराईव्हल

•  सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - द जंगल बुक

•  सर्वोत्कृष्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट - सिंग

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बिस्कीटं खाण्यात महाराष्ट्राचा एक नंबर!

विविधतेने नटलेला महराष्ट्र, या राज्यातच अनेक संस्कृती वसल्या आहेत असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. पवालो पावली इथली खाद्यसंस्कृती बदललेली पाहायला मिळेल, पण असे असले तरी या राज्याने सीमेपलीकडलच्या खाद्यसंस्कृतीलाही आपलेसे केले आहे. सकाळच्या न्याहारीत आता कांदेपोहे, शिरा, उपमा, पोळी भाजी, आंबोळ्याबरोबर डोसा, इडली, पाव, कॉर्न फेक्स असेही पदार्थ दिसू लागले आहेत. या पदार्थांच्या यादीत आणखी एका पदार्थांचे नाव आवर्जुन घ्यावे लागले ते म्हणजे बिस्कीट. सर्वाधिक बिस्कीटे खाणा-यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल आहे असे समोर आले आहे.

वर्षभरात महाराष्ट्रात १ लाख ९० हजार टन बिस्किटे विकली गेली आहेत. बिस्कीट उत्पादक कल्याण मंडळाने केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार २०१६ मध्ये भारतात ३६ लाख टन बिस्कीटांची विक्री झाली. या विक्रीत दरवर्षी ८ ते १0 टक्क्यांची भर पडत असल्याचेही या सर्व्हेक्षणात म्हटले आहे. सध्याच्या घडीला देशात बिस्किटांची विक्री ३७ हजार ५०० कोटींवर पोहोचली आहे, आणि सर्वाधिक मागणी ही महाराष्ट्रात असल्याचे म्हटले आहे.

 महाराष्ट्रात ग्लूकोज, मारी आणि मिल्क बिस्कीटांना मोठी मागणी आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक बिस्कीटे खाणा-या राज्यात उत्तरप्रदेश व उत्तराखंडाचा समावेश आहे. येथे १ लाख ८५ हजार टन बिस्कीटांची विक्री झाली. त्या खालोखाल तामिळनाडू आहे. येथे १ लाख ११ हजार तर पश्चिम बंगालमधे १ लाख २ हजार टन बिस्किटे खपली आहेत.

पण पंजाब, हरियाणा, ओडिशा यांसारख्या राज्यात मात्र बिस्कीटांना पुरेशी मागणी नाही. या राज्याने मात्र याकडे काहीशी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहेत. या राज्यांत ३९ ते ५२ हजार टनांच्या आसपासच बिस्कीटांची विक्री झाली असल्याचे दिसून येत आहे. व्यग्र जीवनशैलीत खाद्याच्या आवडीनिवडीही बदलू लागल्या आहेत. आज स्वस्थ बसून न्याहारी करायलाही कोणाला वेळ नाही, अशावेळी प्रवासात अनेकांची बिस्कीटांना पसंती असते. त्यातून हल्ली बिस्कीट देखील पौष्टीक असल्याचा दावा अनेक कंपन्यांकडून केला जातो त्यामुळे साहजिक न्याहरीत किंवा खाद्यपदार्थांच्या यादीत बिस्कीटांचे महत्त्व वाढत चालले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹Maha budget 2017: राज्याचा अर्थसंकल्प १८ मार्चरोजी सादर होणार

महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १८ मार्चरोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पात राज्यासाठी काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे तिस-यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पानंतर सर्वांचे लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाकडे असते. यंदा राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ६ मार्चरोजी सुरुवात होणार आहे. १८ मार्चरोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. राज्यात महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या असून यामध्ये भाजपने चांगली कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पामध्ये काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ९ मार्चरोजी मुंबई महापालिकेतील महापौरांची निवड होणार आहे. या सर्व घडामोडींचे परिणाम अर्थसंकल्पावर दिसणार का याकडेही जाणकारांचे लक्ष लागले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ISSF shooting World Cup : जितू राय आणि हिना सिंधुला १० मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्णपदक

दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सोमवारी जितू राय आणि हिना सिंग या जोडीने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. जितू राय आणि हिना सिंग यांनी मिश्र प्रकारातील १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम लढतीत जपानच्या जोडीचा पराभव केला. मात्र, मिश्र प्रकार प्रायोगिक तत्त्वावर खेळवण्यात येत असल्याने या दोन्ही खेळाडूंच्या गुणांमध्ये त्यामुळे कोणताही फरक पडणार नाही.

काही दिवसांपूर्वी भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकाराऐवजी मिश्र लढती आयोजित करण्याची सूचना केली होती. नोव्हेंबर २०१५ मध्येही ५० मी रायफल प्रोन पुरुष, ५० मीटर पिस्तूल पुरुष, डबल ट्रॅप पुरुष प्रकाराच्या लढती मिश्र स्वरूपात रूपांतरित करण्याची शिफारस बिंद्रा समितीने आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेला केली होती. या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात मिश्र लढतींची चाचपणी सुरू आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत प्रत्येक खेळात महिलांचे प्रतिनिधित्व ५० टक्के असावे यासाठी प्रत्येक खेळाच्या संघटनेने प्रयत्नशील असावे, असे निर्देश आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दिले होते. सद्य:स्थितीला ऑलिम्पिक स्पर्धेत नऊ प्रकारांत पुरुषांच्या लढती होतात, तर महिलांसाठी सहा प्रकार आहेत. शारीरिक संपर्क असणाऱ्या कुस्ती, बॉक्सिंग आणि फुटबॉलसारख्या खेळांमध्ये मिश्र प्रकारात लढती आयोजित करण्याची पद्धत रद्द करण्यात आली. मात्र नेमबाजी खेळाचे स्वरूप एकाग्रतेशी संलग्न असल्याने मिश्र प्रकाराचा प्रस्ताव मांडण्यात आला. काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर मिश्र प्रकारात लढती होत असत. मात्र १९८४ मध्ये पुरुष आणि महिला गट वेगवेगळे करण्यात आले. आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या मान्यतेनंतर हा बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे सादर होईल. ऑलिम्पिक समितीने मंजुरी दिल्यास २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५० मी. पिस्तूल, ५० मीटर रायफल प्रोन आणि डबल ट्रॅप प्रकारात फक्त पुरुषांसाठीच्या लढती न होता मिश्र प्रकारात लढती होतील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डॉ. विजया राजाध्यक्षांचा आज जनस्थान पुरस्काराने सन्मान

मराठी साहित्यातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते आज (सोमवार) नाशिकमध्ये दिला जाणार आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार सोहळा महाकवी कालिदास नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे आहे.

मराठी साहित्यात चौफेर विषयावर लेखन, स्त्रीवादी लेखिका व समीक्षक म्हणून डॉ. विजया राजाध्यक्ष परिचित आहेत. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालय व एसएनडीटी विद्यापीठात त्यांनी मराठीचे अध्यापन केले आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. त्यांची पहिली कथा स्त्री मासिकातून प्रसिद्ध झाली. ‘अधांतर’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. विदेही, अनोळखी, अकल्पित, हुंकार यांसह त्यांचे १९ कथासंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत. मध्यमवर्गीय स्त्रीजीवनाचे चित्रण त्यांच्या कथांमध्ये दिसून येते. विजया राजाध्यक्ष यांनी सन २००० साली इंदूर येथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच प्रतिष्ठानच्या वतीने ‘कुसुमाग्रज स्मरण’ या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. जनस्थान पुरस्काराने आज स्मरणयात्रेस प्रारंभ होईल. १ ते ९ मार्च या कालावधीत कुसुमाग्रज स्मारक येथे सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नाटक – सस्ती गंमत (सांगली), संवादच्या वतीने हंडाभर चांदण्या, गजानन तायडेंचे ‘शब्दांचे गारूड’, गजल संध्या व काव्य संमेलन, बेंगलुर येथील बासरी वादक एस. आकाश यांचे बासरी वादन, रागिनी कामतीकर यांचे गायन होणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सौदी अरेबियाचा आर्थिक विकास मंदावला

अनेक विदेशींच्या नोकऱया धोक्यात

तेलसंपन्न देश सौदी अरेबियाचा आर्थिक विकासाचा वेग मंदावला आहे. तर सौदी सरकार आता आपल्या अधिकाधिक लोकांना नोकरीवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे अनेक वर्षांपासून तेथे राहत असलेल्या विदेशींवर नोकरी गमाविण्याची वेळ येऊ शकते. सौदी अरेबिया मंद आर्थिक प्रगतीमुळे आर्थिक समस्यांमध्ये अडकली आहे.

खर्च कपात आणि सौदीच्या अधिकाधिक लोकांना नोकरीवर ठेवल्याने व्यवसायावर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. याचे मोठे कारण कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीचा मार आता जगाच्या सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थेवर पडला आहे. सौदी अरेबिया अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक तेल निर्यात करणारा देश आहे.

मागील वर्षी सौदीने आर्थिक विकासाला वेग आणणे आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी व्हिजन 2030 जारी केले होते. त्याचबरोबर सौदी नागरिकांना खासगी क्षेत्रात अधिकाधिक संधी देण्याचा त्यात समावेश होता. 2014 पासून तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. तेव्हापासून सौदीला मोठा अर्थसंकल्पीय तोटा सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर खासगी कंपन्या विशेषकरून बांधकाम व्यवसायावर कोटय़वधींच्या कर्जाचा भार आला आहे. सौदी बिनलादेन समूहाने गरीब देशांच्या जवळपास 70 हजार लोकांना नोकरीवरून काढले आहे.

अनेक विदेशी सोडताहेत सौदी
एकीकडे सौदी कंपन्या लोकांना कामावरून काढत आहे, तर विदेशी नागरिक देखील व्यवसाय सोडून जात आहेत. कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील एका विदेशी व्यवस्थापकानुसार त्याच्या व्यवसायात 10 टक्के घसरण झाली आहे. कंत्राटाचे नूतनीकरण होत नसल्याने लोक देश सोडून जात आहेत. सर्वजण दडपणाखाली आहेत. सौदीत असा कोणताही व्यवसाय नाही, जो प्रत्यक्षात चांगले काम करत आहे. माझ्या कंपनीने आतापर्यंत 300 जणांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यात बहुतेक भारतीय, पाकिस्तानी आणि फिलीपाईन्सच्या नागरिकांचा समावेश आहे. जे लोक महिन्याला 10 हजार रियालपेक्षा कमी कमवतात, त्यांना कुटुंबाला मायदेशी पाठवा किंवा नोकरी सोडा असे सुचविण्यात आले. जेणेकरून सौदी लोकांसाठी स्थान बनविता येईल असे त्यांनी सांगितले.

विदेशी कामगारांवर अधिभार
आता सौदी सरकार जुलै महिन्यापर्यंत विदेशी कर्मचाऱयांवर (त्यांच्या आश्रितांसमवेत) लेव्ही लावण्याची तयारी करत आहे. सध्या एका महिन्यात 100 रियाल (27 डॉलर्स किंवा जवळपास 1700 रुपये) घेतले जातील, 2020 मध्ये हा कर 400 रियाल (108 डॉलर्स किंवा 6800 रुपये) करण्याची योजना आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘इग्नु’ बनले देशातील पहिले कॅशलेस विद्यापीठ

पुढील सत्रापासून सर्व प्रक्रिया ऑनलाईन

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नु) सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करताना कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे पाऊल टाकले आहे. नवीन सत्रासाठी विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करून देशातील पहिले कॅशलेस विद्यापीठ बनण्याचा बहुमान मिळवला आहे. कुलगुरू प्रा. रवींद्रकुमार यांनी ही माहिती दिली.

कुलगुरू रवींद्रकुमार यांनी सांगितले, या वर्षापासून इग्नु प्रवेश तसेच पुनःनोंदणीकरण प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. यासाठीची स्वतंत्र लिंक विद्यापिठाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी याचाच वापर करून प्रवेश अर्ज अथवा नोंदणी अर्ज प्राप्त करू शकतात. जून 2017 मधे होणाऱया सत्र परीक्षांसाठीही अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. यासाठी 30 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

या निर्णयामुळे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अर्थात इग्नु हे देशातील पहिले कॅशलेस विद्यापीठ बनले आहे. विद्यापिठाच्या सर्वच विभागीय केंद्रांवर पीओएस मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या केंद्रांवरून विद्यार्थी परीक्षा शुल्क, प्रवेश शुल्क मशीनने जमा शकतात, असेही त्यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सरकार इथेनॉलचा वापर वाढविणार

खनिज तेलाची देशातील वाढती मागणी पाहता मोठय़ा प्रमाणात विदेशी चलन भारतातून बाहेर जाते. तेल आयातीची निर्भरता कमी करण्यासाठी केंद्र सरकार इथेनॉल आणि मेथनॉलच्या वापरासाठी प्रोत्साहन देणार आहे. सरकारचे प्रयत्न यशस्वी ठरल्यास तेल आयातीच्या बिलामध्ये 1 लाख कोटी रुपयांची बचत होईल असा सरकारचा अंदाज आहे.

आगामी मंत्रीमंडळ बैठकीत इथेनॉल धोरण मांडण्यात येणार आहे. दुसऱया पिढीतील इथेनॉलचा वापर वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. इथेनॉलचा वापर वाढल्यास त्याचा पर्यावरणावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. सध्या देशातून अंदाजे 190 कोटी लीटर इथेनॉलचे उत्पादन घेण्यात येते. मात्र प्रत्यक्षात 300 कोटी लीटरची आवश्यकता भासत आहे. आगामी काही वर्षात देशातील मागणी 400 ते 500 कोटी लीटरवर जाण्याची शक्यता आहे, असे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.

टोलनाक्यांवर वाहने, ट्रकना विलंब होत असल्याने व्यापाऱयांचे तसेच नागरिकांचे मोठे नुकसान होते. यासाठी सर्व वाहनांवर इलेक्ट्रॉनिक टोल टॅग लावणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. या टॅगने आपोआप टोल कापणे सोपे जाणार आहे आणि ट्रकना टोल नाक्यांवर रोख रक्कम देण्यासाठी थांबण्याची आवश्यकता भासणार नाही. पेट्रोलियम मंत्रालयाने 50 हजार ट्रकांवर टॅग लावला आहे असे गडकरी यांनी म्हटले. एका अहवालानुसार टोल नाक्यांवर विलंब होत असल्याने प्रतिवर्षी 70 हजार कोटी रुपयांचे नुकसान होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या सेटर्थवेटचा विक्रम

न्यूझीलंड महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू एमी सेटर्थवेटने वनडे क्रिकेटमध्ये सलग चार सामन्यात चार शतके नोंदविण्याचा नवा विक्रम नोंदविला आहे. वनडे क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारी सेटर्थवेट ही पहिली महिला क्रिकेटपटू आहे.
पुरूषांच्या वनडे क्रिकेटमध्ये लंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक कुमार संगकाराने सलग चार सामन्यात चार शतके झळकविली होती. सेटर्थवेट हिची फलंदाजी चांगलीच बहरली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये तिने पाक विरूद्धच्या वनडे सामन्यात नाबाद 137 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दोन दिवसांच्या अंतराने झालेल्या पाक विरूद्धच्या पुढील वनडे सामन्यात सेटर्थवेटने नाबाद 115 धावा झळकविल्या. या मालिकेतील तिसऱया आणि शेवटच्या वनडे सामन्यात तिने 99 चेंडूत 123 धावा झळकावून आपल्या संघाला मालिका विजय मिळवून दिला होता. रविवारी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे सामन्यात सेटर्थवेटने 101 धावांची नाबाद खेळी केली. तिचे हे वनडे सामन्यातील सलग चौथे शतक असून तिने पुरूष विभागातील कुमार संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘RAHAT’ वैद्यकीय प्रकल्पाला राजस्थान मध्ये सुरूवात

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या हस्ते हृदयविकाराच्या गंभीर परिस्थितीत दुर्गम व ग्रामीण भागातील लोकांना वेळेवर उपचार उपलब्ध होण्यासाठी “राजस्थान हार्ट अटॅक ट्रीटमेंट प्रोग्राम (RAHAT)” या वैद्यकीय प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. राजस्थान हे तामिळनाडू नंतर हृदय रोगासाठी आरोग्य सुविधा उपक्रम चालवणारे देशातील दुसरे राज्य झाले आहे.

या उपक्रमांतर्गत हृदय रोगावर उपचार करण्यासाठी आवश्यक ती उपकरणे आणि प्रशिक्षित रूग्णसेवा कर्मचारी असलेली RAHAT रुग्णवाहिका सेवेसाठी सुरू करण्यात आली. या रुग्णवाहिकेमध्ये मूलभूत असे उपचार प्रदान केले जाईल.

RAHAT प्रकल्प हा इटर्नल हार्ट केअर सेंटर हॉस्पिटल, राजधानी जयपूर यांनी सुरू केला आहे. RAHAT प्रकल्प म्हणजे अतिशय गंभीर असा हृदयविकाराचा झटका ‘ST-इलीव्हेशन म्योकार्डीयल इन्फार्क्शन (STEMI)’ चे व्यवस्थापकीय टेलीमेडिसीन मंच आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय नौदलाचा वार्षिक सराव “ट्रोपेक्स 2017” संपन्न

24 जानेवारी 2017 ते 23 फेब्रुवारी 2017 दरम्यान आयोजित भारतीय नौदलाचा वार्षिक “थिएटर लेव्हल रेडीनेस अँड ऑपरेशनल एक्झरसाइज (TROPEX 17)” ची सांगता झाली. हा सराव पश्चिम किनारपट्टी लगत आयोजित होता.

या सरावामध्ये भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि भारतीय तटरक्षक यांची पश्चिम आणि पूर्व नौदल कमांड येथील जहाजे आणि विमानांचा सहभाग आहे. सरावादरम्यान विविध योजनेमधून युद्धसराव आयोजित केले गेले. तसेच वेगवेगळ्या स्थितीत तीनही संरक्षण दलामध्ये समन्वय राखण्याकरिता सराव करण्यात आला.

सरावामध्ये 45 जहाजांचा सहभाग पाहिला गेला. यामध्ये INS विक्रमादित्य, आण्विक पाणबुडी ‘चक्र’ सह 05 पाणबुड्या, 50 नौदलाचे विमान, तटरक्षक दलाची 11 जहाजे, लष्कराच्या तुकड्या व Su 30, जग्वार आणि AWACS सह 20 विमाने यांचा समावेश केला गेला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गोयल, शिवलकर, रंगास्वामींना नायडू पुरस्कार

भारताकडून खेळण्याची संधी काही कारणास्तव हुकली असली तरी भारतीय क्रिकेट बोर्डाने राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर या ज्येष्ठ क्रिकेटपटूंना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याच पुरस्काराने महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांनाही गौरविण्यात येणार आहे.

डावखुरे फिरकी गोलंदाज गोयल आणि शिवलकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाने सोमवारी जाहीर केले. ८ मार्चला बेंगळुरू येथे उपरोक्त मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

बीसीसीआयच्या पत्रकात म्हटले आहे की, एन. राम, रामचंद्र गुहा व डायना एडलजी यांच्या समितीने गोयल व शिवलकर यांच्या कर्तृत्वाचीही दखल घ्यायला हवी अशी शिफारस केली.

गोयल यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७५० बळी घेतले आणि त्यातील ६३७ बळी हे रणजी क्रिकेटमध्ये होते. स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाने घेतलेल्या बळींमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे.

शिवलकर १२४ प्रथम श्रेणी सामन्यांत खेळले. त्यांच्या खात्यात ५८९ बळी जमा आहेत. त्यांनी घेतलेल्या पाच बळींची संख्या ४२ असून १३वेळा त्यांनी १० बळी घेतले. बिशनसिंग बेदी यांची गोलंदाजी बहरात असताना या दोघांनीही आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवला होता, पण त्यांना भारतीय संघाचे दरवाजे मात्र कधीही उघडले नाहीत.

रंगास्वामी यांच्या रूपात प्रथमच नायडू पुरस्काराचा मान एका महिला क्रिकेटपटूला मिळाला आहे. रंगास्वामी यांनी १२ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले तर १६ वनडे सामन्यांत त्या खेळल्या.

वामन विश्वनाथ कुमार व दिवंगत रमाकांत देसाई यांचीही बीसीसीआयच्या विशेष पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानासाठी त्यांना गौरविण्यात येणार आहे. ८ मार्चला होत असलेल्या या पुरस्कार सोहळ्याआधी मन्सूर अली खान पतौडी व्याख्यानाचे आयोजनही करण्यात येणार असून त्यात भारताचे माजी यष्टिरक्षक फारुख इंजीनियर हे विचार मांडणार आहेत.

इंजीनियर यांनी ४६ कसोटीत तसेच ५ वनडे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वस्त्राहून मऊ, वज्राहून कठीण

येथील वैज्ञानिकांनी वस्त्राहून मऊ मात्र पोलादाहूनही कठीण अशा अत्यंत लवचिक स्वरूपाच्या वस्तूचा शोध लावला असून त्याचे भविष्यकाळात अगणित उपयोग असतील, असा अंदाज आहे. काचेच्या तारांत विणलेल्या हायड्रोजेल्सने या विलक्षण "पदार्थाचा" शोध लावला आहे.

समाजाला उपयोग होण्याबरोबरच पर्यावरणास्नेहीही असलेल्या उत्पदानांचा शोध लावण्याचे प्रयत्न सध्या जगभर सुरू आहेत. त्यातूनच हा शोध लागला आहे. जपानच्या होक्कायदो युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी हायड्रोजेल्सचा (पाण्याचा जेलीसदृश्य प्रकार) वापर करून मजबूत वस्तूचा शोध लावण्याच्या इराद्याने संशोधन सुरू केले होते.

अशा प्रकारच्या वस्तूचा शोध लावण्यात वैज्ञानिकांना याआधीही यश मिळाले होते. मात्र इतका मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारा तसेच भरवशाचा पदार्थ हाती आला नव्हता. वैज्ञानिकांनी या हायड्रोजेल्सचा वापर काचेच्या तारांशी वीण निर्माण करण्यासाठी केला. त्यातून लवचिक परंतु मजबूत पदार्थ हाती आला. अत्यंत मजबूत प्रकारच्या प्लास्टिकच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी प्रक्रिया यात वापरण्यात आली.

वैज्ञानिकांना असे आढळून आले की १० मायक्रोमीटर (एका सेंटीमीटरच्या एक हजारावा भाग) व्यासाच्या काचेच्या तारेसोबत याआधीच माहीत असलेल्या हायड्रोजेलचा मिलाफ केल्यास अगदी नव्या प्रकारचा मजबूत आणि लवचिक पदार्थ तयार होतो. हे दोन घटक एकत्र मिसळले की झाले, इतकी ही सोपी प्रक्रिया असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.

या दोन्ही घटकांच्या संगमातून हाती येणारी लवचिक वस्तू मूळ काचेच्या तारेपेक्षा २५ पट मजबूत आणि हायड्रोजेल्सच्या १०० पट मजबूत आहे. नव्या स्वरूपातील हायड्रोजेल हे कार्बन पोलादापेक्षा पाचपट मजबूत असते. शिवाय यात ४० टक्के हिस्सा पाण्याचा असल्याने ही वस्तू पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल आहे, असे ज्याँ पिंग गाँग या वैज्ञानिकाने सांगितले.

या वस्तूच्या मजबूत, विश्वासार्ह आणि लवचिकतेमुळे त्याचे अनेक उपयोग होऊ शकतात. विविध उत्पादने आणि वस्त्रोद्योगाबरोबरच कृत्रिम अवयव बनवण्याच्या कामीही येऊ शकते. खूप वजन झेलण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकतो, अशा शक्यता त्यांनी वर्तवल्या. शिवाय त्याचा संगम रबरसारख्या अन्य वस्तूंशी करूनही अनेक वस्तू तयार करता येतील, असेही ते म्हणाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आता कमी घातक पॅलेट गनचा वापर

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील आंदोलकांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या पॅलेट गनमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे आंदोलकांना कमी दुखापत होईल, असे सांगण्यात आले.

सीआरपीएफचे महासंचालक के. दुर्गाप्रसाद यांनी सोमवारी ही माहिती दिली. पॅलेट गनमधून सोडण्यात येणाऱ्या छऱ्यांच्या तोंडाला एक डिफ्लेक्टर बसविण्यात येणार आहे. या डिफ्लेक्टरमुळे पॅलेट गनमधून सुटलेले छर्रे जमिनीच्या दिशेने जातील व आंदोलकांच्या शरीराच्या वरच्या भागात इजा होणार नाही. या बदलांची माहिती देण्यासाठी सीमा सुरक्षा दलांची एक विशेष कार्यशाळाही घेण्यात आली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘चौथी भारत-CLMV व्यवसाय परिषद’ जयपूर येथे संपन्न

वाणिज्य विभाग, व्यापार व उद्योग मंत्रालय आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय उद्योग महासंघ (Confederation of Indian Industry -CII) कडून जयपूर, राजस्थान येथे 27-28 फेब्रुवारी 2017 दरम्यान ‘चौथी भारत-CLMV व्यवसाय परिषद (Business Conclave)’ संपन्न झाली.

CLMV म्हणजे कंबोडिया, लाओ PDR, म्यानमार, व्हिएतनाम देशांमध्ये परदेशी प्रतिनिधींना प्रकल्पासाठी आवश्यक गुंतवणूक भारतीय उद्योगांकडून आकर्षित करून त्यांच्या प्रकल्पामध्ये आर्थिक भागीदारी वाढविण्यासाठी संधि देण्यासाठी हा परिषदेचे आयोजन केले गेले.

परिषदेमध्ये औषधनिर्माण, हेल्थकेअर, कृषि, अन्न प्रक्रिया, माणीक आणि दागिने, वस्त्रोद्योग, कातडी, अक्षय ऊर्जा, शिक्षण क्षेत्रात भर दिला गेला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून नंदकुमार साई यांची नियुक्ती

छत्तीसगड मधील भाजपचे ज्येष्ठ आणि आदिवासी नेते नंदा कुमार साई यांची अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाचे (NCST) नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

साई हे पूर्वीच्या अखंड मध्य प्रदेशच्या काळात भाजपचे अध्यक्ष होते. वर्ष 2000 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या छत्तीसगड विधानसभेचे ते पहिले विरोधी नेते होते.

संविधान (89 वे संशोधन) अधिनियम, 2003 माध्यमातून कलम 338 मध्ये नवीन कलम 338A अंतर्भूत करून NCST ची स्थापना केली गेली आहे. 89 व्या सुधारणा कायद्यामधून तत्कालीन राष्ट्रीय अनुसूचित आणि अनुसूचित जमाती आयोग हे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC) आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST) अश्या दोन स्वतंत्र आयोगामध्ये विभागले गेले. हा निर्णय 19 फेब्रुवारी 2004 पासून प्रभावी आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि प्रत्येक सदस्यांचा कार्यकालावधी नियुक्ती तारखेपासून तीन वर्षांचा असतो. अध्यक्षाचा केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदासमान दर्जा आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हरियाणा सरकारने पानिपत साठी स्त्री-पुरुष प्रमाण निरीक्षण डॅशबोर्ड स्थापन करणार

हरियाणा सरकारने पानिपत जिल्ह्यासाठी स्त्री-पुरुष प्रमाण दर्शवणारे निरीक्षण डॅशबोर्ड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. डॅशबोर्ड हा 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' कार्यक्रमाचा भाग म्हणून आणण्यात येत आहे.

डॅशबोर्ड ही जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण दर्शवणारी एक ऑनलाइन प्रणाली आहे. यामध्ये प्रत्येक महिन्यात आरोग्य आणि महिला व बाल कल्याण विभागाकडून सर्व गावांमधून संकलित केलेली या विषयक माहिती संकलित केली जाणार आहे.

डॅशबोर्ड मधून देखील प्रचंड तफावत असलेल्या गावांची माहिती दर्शवली जाणार, जेथे आवश्यक पावले सुधारणा करण्याच्या दिशेने उचलली जाणार. डॅशबोर्ड हा एक पथदर्शक प्रकल्प म्हणून राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य सरकारने विकसित केले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एक जुलैपासून सर्व राज्यात लागू होणार जीएसटी

: बर्याच दिवसांपासून रखडलेला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होण्याचा अडथळा आता दूर झाला आहे. येत्या एक जुलैपासून सर्व राज्यांमध्ये जीएसटी लागू केला जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थ खात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी दिली. नुकतीच जीएसटी कायद्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारची बैठक झाली. बैठकीनंतर दास बोलत होते.

येत्या एक जुलैपासून हा कायदा लागू करण्यासाठी सर्व राज्यांनी तयारी दर्शवली असल्याचे दास यांनी सांगितले. दीर्घकाळापासून जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत सर्व राज्यांचे एकमत होत नव्हते. त्यामुळे जीएसटी कायदा पुढे ढकलला जाण्याची शक्यता होती. मात्र आता एक जुलैपासून हा कायदा लागू करण्यास सर्व राज्ये तयार झाली आहेत.

जीएसटी कायद्याबाबतीत इतकी उत्सुकता का?

कराचे दोन प्रकार. प्रत्यक्ष कर म्हणजे जो करदाता स्वतः च्या खिशातून भरतो. उदा. आयकर, मालमत्ता कर. आपल्या देशातील फक्त २-३% इतकेच लोक प्रत्यक्ष कर भरतात. अप्रत्यक्ष कर हा करदाता दुसऱ्याकडून वसूल करून सरकारला भरतो. उदा. विक्रीकर, उत्पादन शुल्क. अर्थ व्यवस्थेतील प्रत्येकजण या ना त्या मार्गाने अप्रत्यक्ष कर भरत असतो. उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यात हा कर वसुलला जातो. जीएसटी कायदा हा संपूर्ण देशातील सर्व राज्यातील अप्रत्यक्ष कर वसूल करण्याची पद्धती पूर्णपणे बदलणार आहे. देशभर सर्व उत्पादक, विक्रेते आणि उपभोक्ता हे सर्वजण फक्त हा एकच कर वसूल करतील आणि भरतील. प्रस्तावित कायद्याच्या देश व्यापी स्वरूपामुळे त्याला इतके महत्व मिळालेले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘बीबीसी’च्या पत्रकारांना देशातील व्याघ्र प्रकल्पात प्रवेशबंदी

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणने (एनटीसीए) बीबीसी आणि त्यांचा पत्रकार जस्टिन रॉलेटवर देशातील सर्व व्याघ्र अभयारण्यात प्रवेश करण्यास पाच वर्षांची बंदी घातली आहे. आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात शिकाऱ्यांविरोधात उचललेल्या पावलांविरोधात प्रश्नचिन्ह निर्माण करणारा बीबीसीचा माहितीपट समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ही बंदी बीबीसीच्या संपूर्ण नेटवर्कवर घालण्यात आली आहे. बीबीसीचे दक्षिण आशिया प्रतिनिधी रॉलेट यांनी काझिरंगा अभ्यारणात गेंड्यावर ‘वन वर्ल्ड: किलिंग फॉर कंजर्व्हेशन’ नावाने एक माहितीपट बनवला होता. यामध्ये गेंड्यांना वाचवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांवर शंका उपस्थित करण्यात आली होती.

जर अभयारण्यात कोणी गेंड्याला नुकसान पोहोचवताना दिसला तर त्याला गोळी मारण्याचे अधिकार फॉरेस्ट गार्डला देण्यात आल्याचा दावा या माहितीपटात करण्यात आला आहे. फॉरेस्ट अधिकाऱ्याला मिळालेल्या या अधिकारामुळे जंगलात गेंड्यापेक्षा मनुष्यच जास्त मारले गेल्याचा दावा रॉलेटने माहितीपटात केला होता.

 गेल्यावर्षी १७ गेंड्यांची हत्या झाली पण २३ लोक ही मारले गेल्याचे त्यांनी म्हटले. वर्ष २०१४ नंतर केवळ दोघांना शिक्षा झाली. तर ५० जणांना गोळी मारण्यात आली. या माहितीपटात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयावर टीका करण्यात आली आहे.
काझिरंगा व्याघ्र अभयारण्याचे संचालक सत्येंद्र सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना गोळी मारण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे म्हटले. फॉरेस्ट गार्ड हे अत्यंत कठीण काम करतात. त्यांच्या बचावासाठी काही कायदे आहेत.

 बीबीसीने चुकीच्या पद्धतीने ते दाखवले आहे. जुने फुटे्ज आणि मुलाखतीत नाटकीय बदल करून दाखवण्यात आले आहे. एनटीसीएकडून पाठवण्यात आलेल्या नोटिशीत म्हटले आहे, बीबीसी आणि जस्टिन रॉलेट यांनी पर्यावरण मंत्रालयाला न दाखवता या माहितीपटाचे प्रसारण केले आहे. त्यांना सात दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा