🔰 Current Affairs Marathi 🔰
🔹‘नासा’चा ‘सुपर प्रेशर बलून’
आपल्या आकाशगंगेच्या बाहेरून
येत पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या वैश्विक किरणांचा अभ्यास करण्यासाठी
‘नासा’तर्फे मंगळवारी भलामोठा ‘सुपर प्रेशर बलून’ वातावरणात सोडण्यात आला.
न्यूझीलंडमधून हा बलून सोडण्यात आला असून त्याचा आकार फूटबॉल स्टेडिअमएवढा आहे.
पृथ्वीच्या वातावरणात दक्षिण गोलार्धात मध्य अक्षांश पट्ट्यावर हा बलून तरंगत
राहणार असून ही मोहीम १०० दिवसांपेक्षा अधिक काळ चालणार आहे. आधीच्या मोहिमांनी
दिलेल्या धड्यावरून या मोहिमेत सुधारणा करण्यात आली असून वापरलेले तंत्रज्ञान अधिक
प्रगत आहे, अशी माहिती या मोहिमेचे प्रमुख डेबी
फेअरब्रदर यांनी दिली.
आपल्या आकाशगंगेच्या बाहेरून
येणाऱ्या आणि पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या अतिप्रचंड ऊर्जेच्या वैश्विक
किरणांचा अभ्यास या मोहिमेद्वारे होणार आहे. या किरणांमधील उच्च ऊर्जेच्या कणांची
पृथ्वीच्या वातावरणातील नायट्रोजनच्या रेणूंशी प्रक्रिया होऊन यूव्ही फ्लोरोसन्स
प्रकाश निर्माण होतो. सर्वाधिक ऊर्जा असलेल्या वैश्विक कणांचा या मोहिमेद्वारे शोध
घेण्यात येत आहे. या कणांची निर्मिती हे मोठे गूढ असून ते आकाशगंगेच्या
केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवरांतून येतात, की
अतिवेगवान पल्सारमधून अथवा आणखी कोठून, त्याची उकल करण्याचा
प्रयत्न यातून होणार आहे. हा बलून पृथ्वीची प्रदक्षिणा करणार आहे.
🔹CRPF च्या महासंचालकपदी राजीव भटनागर
छत्तीसगडच्या सुकमामधील
नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्यानंतर अखेर केंद्र सरकार जागे झाले आहे.
सीआरपीएफच्या महासंचालकपदी राजीव
राय भटनागर यांची आज नियुक्ती करण्यात आली. भटनागर हे १९८३ च्या बॅचचे आयपीएस
अधिकारी आहेत. तर भारत तिबेट सीमा पोलीस (ITBP)च्या
महासंचालकपदी के. पचनंदा यांची नियुक्ती करण्यात आली. पचनंदा हे बंगाल कॅडरमधील
१९८३ च्या बॅचचे अधिकारी आहेत.
सीआरपीएफच्या महासंचालक पदावरून
के. दुर्गा प्रसाद हे २८ फेब्रुवारीला निवृत्त झाले. यानंतर केंद्रीय
गृहमंत्रालयाने अतिरिक्त महानिरीक्षक सुदीप लखटकिया यांच्याकडे सीआरपीएफचा
अतिरिक्त भार सोपवला. यामुळे सीआरपीएफचे महासंचालक पद गेल्या दोन महिन्यांपासून
रिक्त होते.
प्रसाद यांच्या नियुक्तीनंतर ११
मार्चला सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १२ जवान शहीद झाले होते.
त्यानंतरही सीआरपीएफच्या महासंचालकपदाच्या नियुक्तीसाठी सरकारी पातळीवर कुठलीही
हालचाल झाली नाही. यामुळे नक्षलवाद्यांनी पुन्हा डाव रचत २४ एप्रिलला सीआरपीएफच्या
जवानांवर हल्ला केला. यात २५ जवान शहीद झाले. यानंतर सीआरपीएफचे महासंचालक पद
रिक्त असल्यावरून सोशल मीडियातून मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. सरकारवर
दबाव वाढला होता. अखेर २५ जवानांचे बलिदान आणि वाढत्या दबावानंतर सरकार जागे झाले
आणि सीआरपीएफच्या महासंचालकपदी नियुक्ती केली गेली.